‘भारतीय ज्ञानपरंपरेत सर्व ज्ञानशाखांची बीजे’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indian knowledge tradition seeds of all branches of knowledge
छत्रपती संभाजीनगर : ‘जगातील असे कोणते शास्त्र अथवा ज्ञानशाखा नाही की ज्याची बीजे भारतीय ज्ञान परंपरेत सापडणार नाहीत,’ असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. जे. के. बजाज यांनी मंगळवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘रिव्हिजीटींग पॉलिटिकल थॉट अ ॅण्ड इंडिजीनस पॉलिटी थ्रू द लेन्स ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सिफार्ट सभागृहात चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी, माजी कुलगुरू प्रा. संजीवकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर प्रा. ब्रिजेंद्र पांडे यांनी आभासी पद्धतीने बीजभाषण केले. भारतीय राजकीय परंपरेतील विचारांचा नव्याने अभ्यास केल्यास समकालीन राजकीय आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्यासाठी नवे दृष्टिकोन मिळू शकतात, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठानेही अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत.

माजी कुलगुरू डॉ. संजीवकुमार शर्मा म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेतील तत्वानूसार राजकीय व्यवस्थेत राज्यकर्त्यांना दायीत्वाची भावना असणे गरजेचे असते. मात्र, दुर्दैवाने आपल्या राज्यकर्त्यांनी यापेक्षा जास्त अधिकार बजावण्यावरच भर दिला.