Nashik News: पावसातही टँकरवाऱ्या कायम; मालेगावातील 5 गावे आणि 30 वाड्या तहानलेल्याच

महाराष्ट्र टाइम्स

Water Crisis in Malegaon: नाशिक जिल्ह्यात १६ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना, मालेगाव तालुक्यात अजूनही पाणीटंचाई आहे. प्रशासनाला पाच गावे आणि २५ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, ज्यामुळे १४ हजारहून अधिक ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत स्थानिक पातळीवर पाणी उपलब्ध झाल्यास टँकर बंद होण्याची शक्यता आहे.

Water Tankers in Malegoan
म.टा. प्रतिनिधी, नाशिक: एकीकडे धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे तब्बल १६ धरणांमधून एकाचवेळी विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली असताना जिल्ह्यात अजूनही काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. पावसाळ्याचा हंगाम संपण्यास अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना मालेगाव तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.

जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. जूनमध्ये सरासरीच्या १२६ टक्के पाऊस झाला. जुलैत पावसाचा जोर ओसरला पण ऑगस्टमध्ये पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून तब्बल १६ धरणांसह नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. असे असताना जिल्ह्यातील मालेगावात अगदी विरोधाभासी चित्र पहावयास मिळत असून, टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. यंदा मेमध्ये उन्हाची तीव्रता जाणवली नाही. पावसाळ्यात पडावा असा पाऊस मे महिन्यात पडला. परंतु, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे नाशिक, कळवण, निफाड आणि दिंडोरी हे चार तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. जिल्ह्यातील १६३ गावे आणि ४२८ वाड्या अशा ५९१ ठिकाणी १४८ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.
टँकरच्या ३१६ फेऱ्यांद्वारे तब्बल २ लाख ६७ हजार ५२२ जणांना पाणी पुरविण्यात येत होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने १० तालुक्यांमधील टँकर बंद करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही मालेगाव तालुक्यातील पाच गावे आणि २५ वाड्या अशा ३० ठिकाणी पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. येथील १४ हजार ९११ ग्रामस्थांना पाणी पुरविण्यासाठी दिवसभरात टँकरच्या दहा फेऱ्या होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ऑगस्टअखेर स्थानिक पातळीवर पाण्याची उपलब्धता होऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी वर्तविली आहे.