‘रो-रोपेक्षा प्रवासी गाड्या चालवा’; परतीच्या प्रवासासाठी प्रवासी संघटनांची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Ro-Ro Service Low Response:कोकण रेल्वेने सुरू केलेल्या कारवाहतुकीच्या रो-रो सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. मुंबई-कोकण मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुरू केलेल्या या सेवेत पहिल्या फेरीत केवळ पाच कार आणि १९ प्रवाशांनी प्रवास केला. महागडे भाडे आणि वेळेमुळे प्रवाशांनी या सेवेवर नाराजी व्यक्त केली, प्रवासी संघटनांनी रो-रोऐवजी प्रवासी गाड्या चालवण्याची मागणी केली आहे.

Konkan Railway Ro-Ro Service
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कोकण रेल्वे ने कारवाहतुकीची रो-रो सेवा सुरू केली. पहिल्या रो-रो सेवेला अत्यंत कमी प्रतिसाद लाभला. त्यामुळे कोकण रेल्वेने रो-रोचा हट्ट न धरता प्रवासी रेल्वे गाड्या चालवाव्यात, यामुळे किमान परतीच्या प्रवासात तरी याचा लाभ मिळेल’, अशी मागणी कोकणातील प्रवासी संघटनांनी केली आहे.

मुंबई-कोकण रस्ते मार्गावरील खड्डे आणि वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोकण रेल्वेने प्रथमच खासगी गाडीसह प्रवासी वाहतूक करण्यासाठी रो-रो सेवेची घोषणा केली होती. पहिल्या रो-रोमध्ये अवघ्या पाच कार आणि १९ प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी साधारण १० मालवाहतुकीचे आणि दोन प्रवासी डबे जोडण्यात आले होते. ‘ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वेच्या मार्गावर १२ रेल्वे डब्यातून अवघे १९ प्रवासी प्रवास करत असल्यास अन्य रेल्वे प्रवाशांची ही थट्टाच म्हणता येईल’, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.
महागडे भाडे आणि गाडी लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी लागणारा वेळ यांमुळे पहिल्या दिवसापासून कोकण रेल्वेची कार वाहतुकीची रो-रो प्रवाशांकडून टीका करण्यात आली होती. पहिल्या रो-रो सेवेसाठी किमान १६ वाहनांची मर्यादा होती. प्रवासी प्रतिसाद वाढवण्यासाठी नांदगाव रोड हा विशेष थांबा घोषित करण्यात आला. दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेर प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी केवळ पाच कारसह रो-रो कोलाडहून वेर्णासाठी रवाना झाली. नांदगावपर्यंत चार वाहने आणि वेर्णापर्यंत एका गाडीने रो-रोचा प्रवास पूर्ण केला आहे.

'परतीच्या प्रवासासाठी तरी सोय करा'

कोकण रेल्वेने प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊन त्यानुसार रेल्वेगाड्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झाला आहे. मुंबईसह उपनगरात राहणारे कोकणवासी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहे. त्यांचा परतीचा प्रवास सुरक्षित आणि कमी गर्दीचा होण्यासाठी कोकण रेल्वेने कार वाहतुकीच्या रो-रो ऐवजी विशेष प्रवासी रेल्वेगाड्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य कोकणवासियांमधून उमटत आहे.